शेतकरी मागण्यांसाठी १० एप्रिलला मुर्तिजापुरात ‘चक्का जाम’; शिवसेना (उबाठा) आक्रमक, प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा
अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ६ एप्रिल २०२६,मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुर्तिजापूर (अकोला): सन २०२५ च्या खरीप हंगामातील पीक विमा तात्काळ मिळावा, कर्जमुक्तीसाठी कोणतीही अट लावू नये आणि शहरातील भगतसिंग चौकात गतिरोधक बसवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रशासनाला ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात तालुका प्रमुख गजानन सदाशिवराव चौधर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना (SDO) निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे मुर्तिजापूर तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची घोषणा केली होती, मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. याशिवाय शासनाने जाहीर केलेली २,००,००० रुपयांची कर्जमुक्ती कोणतीही अट न लावता चालू आणि थकीत अशा सर्व खातेदारांना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुर्तिजापूर मेन रोडवरील भगतसिंग चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी चारही बाजूंनी गतिरोधक बसवण्यात यावेत आणि चौकातील वाढते अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी भगतसिंग चौकात तीव्र ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद मुख्याधिकारी आणि पोलीस ठाणेदार यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


