महाआवास अभियानात अमरावती विभागाची ऐतिहासिक कामगिरी; थेट राज्यात द्वितीय क्रमांक
अमरावती प्रतिनिधी विलास सावळे, २० मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘महाआवास अभियान २०२३-२४’ मध्ये अमरावती विभागाने अत्यंत उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यश संपादन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी करत अमरावती विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य दिव्य कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अमरावती विभागाच्या वतीने तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, अपर आयुक्त (विकास) शालिनी कडू व उपायुक्त राजीव फडके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या या गौरव सोहळ्यास राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व प्रधान सचिव एकनाथ डवले यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात विभागीय आयुक्त (अमरावती विभाग), अपर आयुक्त (विकास), सहाय्यक आयुक्त (विकास), अकोला व अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि पातुर (जि. अकोला) चे गटविकास अधिकारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून विशेष गौरविण्यात आले.
राज्य पुरस्कृत आवास योजनेत अमरावती विभागाला संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
अमरावती जिल्हा परिषदेला ‘राज्य पुरस्कृत आवास योजनेत’ राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला, तर अकोला जिल्हा परिषदेला ‘प्रधानमंत्री आवास योजनेत’ राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समितीने ‘प्रधानमंत्री आवास योजनेत’ थेट राज्यात प्रथम क्रमांक पटकावण्याची चमकदार कामगिरी केली.
वाईगौळ ग्रामपंचायत (ता. मानोरा, जि. वाशीम) – प्रधानमंत्री आवास योजनेत तृतीय क्रमांक, बेलुरा बु. ग्रामपंचायत (ता. अकोट, जि. अकोला) – ‘उत्कृष्ट बहुमजली इमारत’ श्रेणीत तृतीय क्रमांक आणि देपूळ ग्रामपंचायत (ता. व जि. वाशीम) – राज्य पुरस्कृत आवास योजनेत तृतीय क्रमांक मिळवून बाजी मारली.
या संपूर्ण सोहळ्याचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील इनापूर येथील रहिवासी व लाभार्थी दशरथ सवई-चव्हाण यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चक्क संपूर्ण ‘देशातील ३ कोटी क्रमांकाचे घरकुल’ यशस्वीपणे पूर्ण करण्याचा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक मान मिळवला. त्यांच्या या विक्रमी कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना त्यांच्या हक्काच्या घराची सोन्याची चावी प्रदान करून संपूर्ण देशाच्या वतीने विशेषरित्या सन्मानित करण्यात आले.
या ऐतिहासिक आणि दैदिप्यमान यशाबद्दल अमरावती विभागाच्या विद्यमान विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले. कौतुकाची थाप देतानाच त्यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले की, विभागात अद्याप जी काही घरकुलांची कामे विविध कारणांमुळे अपूर्ण आहेत, ती सर्व कामे येत्या काळात अत्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण रितीने त्वरित पूर्ण करावीत, जेणेकरून प्रत्येक बेघराला हक्काचे छत मिळेल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


