माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे महार-मातंग समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब झोंबाडे यांची आयोजकांवर आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , १३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत सामाजिक सलोखा बिघडवणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी आयोजित “आरक्षण उपवर्गीकरण न्याय समर्थन परिषद” या कार्यक्रमादरम्यान माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी “आंबेडकरवादी चळवळ वळवळ” तसेच महार आणि मातंग समाजाबाबत कथितरीत्या अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद व समाजात दुही निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माजी आमदारांच्या या बेताल वक्तव्याचा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. दादासाहेब झोंबाडे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून याप्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने करणे अत्यंत लज्जास्पद असून, दादासाहेब झोंबाडे यांनी घेतलेल्या या कणखर पवित्र्यामुळे दोन्ही समाजांतील नागरिकांनी त्यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या आक्षेपार्ह विधानाची पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी दादासाहेब झोंबाडे यांनी केली आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,
“कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वर्षानुवर्षांचा सामाजिक सलोखा बिघडेल अशी वक्तव्ये सार्वजनिक व्यासपीठावरून करणे अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या माजी आमदारांवर आणि अशा बेताल वक्तव्यांना मूकसंमती देणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कायद्यानुसार कडक फौजदारी कारवाई करावी.”
सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब झोंबाडे यांनी माजी आमदार सुधाकर भालेराव यांना भविष्यात कोणत्याही समाजाबाबत किंवा महापुरुषांच्या विचारांबाबत बेताल, आक्षेपार्ह अथवा समाजात द्वेष पसरविणारी वक्तव्ये न करण्याचा कडक इशारा दिला आहे. “अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्ये पुन्हा झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन उभे करू,” असा इशारा त्यांनी दिला.
दोन्ही समाजांमधील ऐतिहासिक आणि सामाजिक बंधुभावाचा उल्लेख करताना दादासाहेब झोंबाडे भावूक व ठामपणे म्हणाले,
“महार आणि मातंग समाज हा युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेच्या, बंधुभावाच्या व सामाजिक न्यायाच्या पवित्र विचारांनी प्रेरित आहे. या दोन्ही समाजामध्ये युगानुयुगांपासून बंधुता आणि ऐक्याची मोठी परंपरा आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक हेतूने कोणत्याही व्यक्तीने अथवा संघटनेने या दोन्ही मुख्य घटकांमध्ये तेढ निर्माण करणारी, अपमानास्पद किंवा विभाजनकारी वक्तव्ये करणे अत्यंत निषेधार्ह आहे. महार-मातंग समाजाची ही ऐतिहासिक एकजूट अबाधित असून, सामाजिक न्याय, भारतीय संविधान आणि बंधुभावाच्या मूल्यांसाठी दोन्ही समाज आजही खंबीरपणे एकत्र उभे आहेत आणि भविष्यातही राहतील.”
समाजातील शांतता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी आणि महापुरुषांच्या विचारांचा सन्मान राखण्यासाठी दादासाहेब झोंबाडे यांनी दाखवलेल्या या तत्पर आणि लढवय्या भूमिकेमुळे त्यांचे सर्व पुरोगामी संघटनांकडून आणि नागरिक स्तरावरून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

