अमरावतीत ‘मंअनिस’ची पाक्षिक सभा उत्साहात; वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व संघटन विस्तारावर भर, ९ ऑगस्टला रंगणार ‘तुकडोजी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ परिसंवाद
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन,१३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज वृत्तसेवा:
अमरावती: “वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि मानवता” या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी समाजात विवेकाचा आवाज बुलंद करणे काळाची गरज आहे, असा सूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (मंअनिस) पाक्षिक सभेत उमटला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती जिल्हा व शहर शाखेची पाक्षिक सभा गुरुदेव सेवाश्रम, राधा नगर येथे अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि विचारमंथनात्मक वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ होते, तर राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सभेमध्ये जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार अधिक गतीने करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय व आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
सभेच्या प्रारंभी विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठकीतील निर्णय, विविध शाखांचे अहवाल, संघटनात्मक वाटचाल आणि आगामी उपक्रमांची दिशा यांचे सविस्तर वाचन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व शहर शाखेने राबविलेल्या विविध सामाजिक, प्रबोधनात्मक आणि जनजागृती उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोळमकर, संविधान जागर विभागाचे राजीव बसवनाथे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण तडस आणि नरेंद्र धर्माळे उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्याच्या’ प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनासोबत समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला. अंधश्रद्धाविरोधी मोहिमा अधिक व्यापक स्वरूपात राबविणे आणि विवेकवादी विचार गावागावात पोहोचविण्याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली.
आगामी ९ ऑगस्ट रोजी गुरुदेव सेवाश्रम येथे “तुकडोजी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयावर भव्य परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद आणि लेखन-वाचन कार्यशाळेचे नियोजन सर्वानुमते करण्यात आले. जिल्ह्यात नवीन शाखा स्थापन करून संघटन विस्ताराला गती दिली जाईल. बैठकीत महत्त्वाचे ठोस निर्णय घेण्यात आले.
या पाक्षिक सभेचे विशेष आकर्षण म्हणजे अमरावती शहर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद तायडे यांचा ‘अनिप वार्तापत्र’ प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच ‘अनिप वार्तापत्राच्या’ पाच वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त दोन नवीन वर्गणीदार नोंदविण्यात आले. आगामी काळात या वार्तापत्राचे अधिकाधिक वर्गणीदार करून विवेकवादी विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन मंजू वासनिक यांनी केले, तर सचिन खोब्रागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध उपक्रम विभागाचे जिल्हा कार्यवाह आशिष देशमुख यांनी विशेष संपर्क व समन्वय साधला. सभेच्या शेवटी अंनिसचे गीत सादर करण्यात आले.
या विचारमंथन सोहळ्याला अफसरभाई (जिल्हा कार्यवाह, बुवाबाजी संघर्ष विभाग), प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे, सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, दिलीप लाडे, मनीष गणेशपुरे, दिगंबर मेश्राम, विजया करोले, सुरज मंडे, मिलिंद तायडे, बबिता वानखडे, नरेंद्र धर्माळे, राजीव बसवनाथे, संदीप हिवराळे, प्रमोद कोळमकर यांच्यासह जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विवेकाचा आवाज बुलंद करूया!”, “अंधश्रद्धा हटवा – विवेक वाढवा!” अशा प्रेरणादायी घोषणांनी सभेचा समारोप झाला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


