इंदोर येथील राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत प्रा. सुनील अडसुळे यांना ‘जीवन गौरव’, तर सौ. वर्षा अडसुळे यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान!
१७ राज्यांतील १२० शिक्षकांच्या उपस्थितीत सन्मान; प्रा. अडसुळे यांच्या जंक फूड विरोधी मोहिमेची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण उर्फ मनोज प्रधान, २५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि शैक्षणिक विकासासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या ‘बाल रक्षक प्रतिष्ठान’ या नामांकित संस्थेच्या वतीने नुकतेच मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका भव्य राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि क्रांतीकारी योगदान दिल्याबद्दल मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा. सुनील अडसुळे यांना अत्यंत मानाचा ‘सरदार वल्लभभाई पटेल जीवन गौरव पुरस्कार’ (Life Time Achievement Award) देऊन सन्मानित करण्यात आले.
याच सोहळ्यात त्यांच्या पत्नी सौ. वर्षा अडसुळे यांच्याही शैक्षणिक आणि विद्यार्थीभिमुख उपक्रमांची दखल घेत, त्यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या आदर्श शिक्षक दांपत्याला राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या दुहेरी बहुमानाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इंदोर येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय परिषदेत संपूर्ण भारतातील १७ वेगवेगळ्या राज्यांमधून तब्बल १२० निवडक शिक्षक उपस्थित होते. या राष्ट्रीय व्यासपीठावर प्रा. सुनील अडसुळे यांनी उपस्थित देशाभरातील शिक्षकांना ‘जंक फूडचे घातक दुष्परिणाम’ या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
आजची तरुण पिढी आणि शाळकरी मुले जंक फूडच्या विळख्यात अडकून त्यांच्या आरोग्याचे कसे नुकसान होत आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांसह पटवून दिले. हे केवळ एका शहराचे नसून संपूर्ण देशासमोरील मोठे संकट आहे, याचे गांभीर्य ओळखून परिषदेला आलेल्या सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळांमध्ये आणि राज्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना याविषयी जागरूक करावे व मार्गदर्शन करावे, अशी आग्रही विनंती प्रा. अडसुळे यांनी यावेळी केली.

प्रा. सुनील अडसुळे यांचे जंक फूड विरोधी जनजागृतीचे कार्य अथांग आहे. त्यांनी आजतागायत देशातील २७५ पेक्षा जास्त शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ९०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना जंक फूडच्या दुष्परिणामांवर अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन व व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या या विक्रमी आणि सामाजिक कार्याची अधिकृत नोंद जगप्रसिद्ध ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ (India Book of Records) मध्ये देखील घेण्यात आली आहे.
केवळ व्याख्यानेच नव्हे, तर लेखन क्षेत्रातही प्रा. अडसुळे यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आतापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीच्या एकूण २१ पुस्तकांचे यशस्वी लेखन केले आहे. यामध्ये ‘बालभारती’, ‘एसएससी बोर्ड’ (SSC Board) आणि ‘व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई’ (DVET) यांच्या अधिकृत अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा समावेश आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे, यातील ४ विशेष पुस्तके ही इयत्ता नववी आणि दहावीच्या ‘दिव्यांग’ (विशेष गरजा असणाऱ्या) विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अत्यंत सुलभ रितीने लिहिलेली आहेत.
या राष्ट्रीय शिक्षण परिषदेत बाल रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या हस्ते या दांपत्याला राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या या अडसुळे दांपत्याच्या यशामुळे महाराष्ट्राच्या, पर्यायाने पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
