सर्वधर्मसमभाव हाच भारताचा खरा राष्ट्रवाद! – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे
फुले, गांधी, नेहरू विचारमंचतर्फे आयोजित “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” व्याख्यानाचे पहिले पुष्प उत्साहात
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २५ मे २०२६ :
पिंपरी: “सर्वधर्मसमभाव हीच आपल्या अखंड भारताची मूळ ओळख असून हाच देशाचा खरा राष्ट्रवाद आहे. सन १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व भेद बाजूला सारून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच खऱ्या अर्थाने भारत राष्ट्र उभारणीची पायाभूत सुरुवात होती. या अथांग भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे यशस्वी नेतृत्व करण्याचे ऐतिहासिक काम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले. तर दुसरीकडे, देशातील वंचित व दलित समाजाला कायद्याच्या बळावर आत्मसन्मान मिळवून देण्याचे क्रांतीकारी काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. गांधी आणि आंबेडकरांमध्ये काही तात्त्विक मतभेद जरूर होते, परंतु देशाच्या अखंडतेसाठी आणि भविष्यासाठी ते सदैव एकत्र होते. त्याच अथांग राष्ट्रवादाचे फलित म्हणजे आजची आपली ‘भारतीय राज्यघटना’ होय,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे यांनी केले.
रविवार, २४ मे २०२६ रोजी पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” या विशेष व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना विजय तांबे बोलत होते.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुख्य आयोजक दाहर मुजावर, अक्षय शहरकर, केनिथ रेमी तसेच विष्णू नेवाळे, अशोक मोरे, अमरसिंह नाणेकर, मिलिंद फडतरे, किरण खाजेकर, मयूर जैस्वाल, गौरव चौधरी, अनिरुद्ध कांबळे, नरेंद्र बनसोडे, हभप सांगोळे, चैतन्य रणदिवे, महेश पाटील, बाबासाहेब पाटील, गिरिजा कुदळे, सायली नढे, जीविका उठाडा, संदेश भंडारी, महालिंग स्वामी, यशराज पारखी, मॅन्युअल डिसोझा, निक्सन ऑगस्टीन, इरफान शेख, बसवराज कंजे, जिंदा सांडभोर, सूरज कुलकर्णी, सचिन दुरगुडे, वैजनाथ शिरसाठ, अनिल कदम, मनोज ढकोलिया, मंगेश मोरे, राजू शेख, अल्ताफ शेख, सूर्यकांत जाधव आणि किरण नढे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्याख्यानात ऐतिहासिक दाखले देत विजय तांबे पुढे म्हणाले, “भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा सर्वात भक्कम पाया १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहाने रचला गेला. हा सत्याग्रह देशाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर लढला गेला, ज्यामध्ये सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पुढे १९४२ मध्ये सेवाग्राम येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ‘निशस्त्र प्रतिकाराचा’ अंतिम निर्णय झाला. १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी एक नकारात्मक भाकीत केले होते की, ‘हा देश विविध धर्म, जाती आणि वंशांचा असल्याने खूप काळ एकत्र राहू शकणार नाही आणि तो विखुरेल.’ मात्र, भारतीय लोकशाही आणि आपल्या पवित्र राज्यघटनेच्या ताकदीमुळे चर्चिलचे ते भाकीत पूर्णपणे खोटे ठरले.”
तांबे यांनी महात्मा गांधी आणि क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्यातील वैचारिक धागा उलगडताना सांगितले की, “महात्मा गांधी जेव्हा पुण्यात ‘महात्मा फुले वाड्यावर’ गेले होते, तेव्हा त्यांनी अत्यंत आदराने उद्गार काढले होते की, ‘हा देश वैचारिकदृष्ट्या घडवणारे खरे महात्मा जर कोणी असतील, तर ते ज्योतिराव फुले आहेत.’ म्हणूनच फुले, गांधी आणि नेहरू या महान नेत्यांच्या सर्वसमावेशक विचारांमुळेच भारतीय राष्ट्रवाद आज जगासाठी आदर्श ठरला आहे.”
भाषणाचा शेवट करताना त्यांनी घटना समितीच्या ऐतिहासिक बैठकीची आठवण करून दिली. घटना समितीच्या शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “मी देशाला एक अत्यंत चांगली घटना दिली आहे, परंतु ती चालवणारे लोक जर चांगले नसतील, तर ती वाईट ठरेल; आणि चालवणारे चांगले असतील, तर ती नक्कीच उत्तम ठरेल.” १८८५ च्या काँग्रेस स्थापनेपासून ते भारतीय राज्यघटना निर्मितीपर्यंतचा संपूर्ण विस्तृत इतिहास विजय तांबे यांनी आपल्या व्याख्यानातून श्रोत्यांसमोर मांडला.
या कार्यक्रमाचे स्वागत अक्षय शहरकर आणि केनिथ रेमी यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन दाहर मुजावर यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
