सलोख्यानेच समृद्ध होईल समाज! अमरावतीत गाडगेनगर पोलिसांच्या पुढाकाराने ‘शांतता समिती व कायदेविषयक मार्गदर्शन’ सभा उत्साहात संपन्न
अमरावती प्रतिनिधी अविनाश वानखेडे, २५ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: “भारत हा विविध संस्कृती, धर्म आणि परंपरांनी नटलेला एक अथांग देश आहे. या बहुसांस्कृतिक देशात राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे ही केवळ पोलिसांची किंवा शासनाची जबाबदारी नसून, ते प्रत्येक सुजाण नागरिकाचे परम कर्तव्य आहे. सर्व धर्मीयांनी एकमेकांच्या सणांमध्ये आनंद शोधून ते एकत्र साजरे केले, तरच खऱ्या अर्थाने बंधुभाव वृद्धिंगत होईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश तराळ यांनी केले.
अमरावती शहरात सामाजिक शांतता, धार्मिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक २४ जून रोजी एका विशेष ‘शांतता समिती व कायदेविषयक प्रबोधन’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शहरातील विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक मंडळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि संवेदनशील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे मुख्य वक्ते व मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. सतीश तराळ यांनी कायद्याच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या विविध पैलूंवर अत्यंत सविस्तर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (MANS) माध्यमातून शहरात सामाजिक सलोखा मजबूत करण्यासाठी राबविण्यात आलेले ‘ईद मिलन’ उपक्रम, रक्तदान शिबिरे आणि विविध ऐक्य उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. समाजातील अज्ञान, फसवणूक, अंधश्रद्धा आणि बुवाबाजीच्या विळख्यातून गरीब जनतेला वाचवण्यासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अधिक प्रभावीपणे राबवून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. वाढत्या वयासोबत ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी ‘ज्येष्ठ नागरिक सुरक्षा कायद्या’ची (Senior Citizens Act) अंमलबजावणी चोखपणे व्हावी.सामाजिक प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी आणि सुसंवाद टिकवण्यासाठी शहरातील सर्व सामाजिक संघटना व ज्येष्ठ नागरिक मंडळांनी दरमहा किमान एक संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी अत्यंत कल्पक सूचना त्यांनी मांडली.
कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना गाडगेनगर पोलीस ठाण्याचे कार्यक्षम वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. गोरखनाथ जाधव म्हणाले:
“पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते हाच शहराच्या सुरक्षिततेचा खरा पाया आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. शांतता समिती ही शहरात सलोखा राखण्याचे एक उत्तम माध्यम आहे. कोणत्याही संवेदनशील परिस्थितीत संयम राखून कायदा हाती न घेता प्रशासनाशी थेट संवाद साधावा.”
तर स्पेशल ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. सुनील चव्हाण यांनी शांतता राखण्यामध्ये नागरिकांच्या आणि विशेषतः तरुण पिढीच्या भूमिकेचे महत्त्व अतिशय सोप्या शब्दांत उपस्थितांना पटवून दिले.

या प्रबोधन सोहळ्यात समाजातील अनेक जबाबदार नेत्यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. श्री. पुरुषोत्तम गावंडे (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक मंडळ) यांनी ज्येष्ठांच्या आरोग्याविषयी व त्यांच्या सुरक्षिततेविषयी पोलिसांच्या पुढाकाराचे स्वागत केले. श्री. डी. एस. पवार (अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटना) यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने सामाजिक चळवळींना सदैव पाठबळ देण्याचा शब्द दिला. श्री. प्रफुल्ल मंदा श्रीधर (जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस) यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्यासाठी संघटना अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही दिली.
या सभेला अमरावती शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष विभागाचे जिल्हा कार्यवाह मो. अफसर भाई, शुभम दमाहे, प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, प्राचार्य दादारावजी दाभाडे, श्रीमती पुष्पाताई साखरे, देविदासजी कोल्हे, चंदनसिंग राजपूत, संजय खोंडे आणि अनिलराव वानखडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक अथांग संख्येने उपस्थित होते.
सभेचा समारोप सामाजिक ऐक्य अधिक भक्कम करणे, अंधश्रद्धामुक्त सुजाण समाजाची निर्मिती करणे आणि कायद्याचे आदरपूर्वक पालन करण्याचा सामूहिक संकल्प आणि सामूहिक राष्ट्रगीताने अत्यंत भारावलेल्या वातावरणात करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
