आळंदी (मॅक्स मंथन डेली न्यूज): प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणीताई पवार, पुरुषोत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे, ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानही आहे. ज्ञानपीठ तयार करण्यासाठी ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात पोहोचेल.”
इंद्रायणी नदीच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह ३९ गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल, असा प्रयत्न करण्यात येईल.”
ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेल्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले, “त्यांना पद्म पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल.”
वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, “देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपली विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्या वेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे.”
संत परंपरेमुळे देश श्रीमंत:
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकरी संप्रदायाने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे. भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही, तर मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. संत परंपरेमुळे आणि त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारामुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली आहे.”
वारीतील स्वयंशिस्त आणि त्यातून निर्माण होणारा आनंद यांचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, “गीतेतील विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आला.”
अशा अध्यात्मिक सोहळ्यांच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
योगी निरंजननाथ यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे आणि त्याच्या ऑडिओ बुकचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
