पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): प्रा. डॉ. रविराज सोरटे यांचा जमिनीखालच्या पाण्याचा प्रवाह शोधण्याचा आणि अपघात टाळण्याचा महत्त्वपूर्ण शोध समाजोपयोगी ठरत आहे. त्यांच्या नावावर तब्बल तीन पेटंट जमा आहेत.
डॉ. सोरटे यांनी डाऊझिंग तंत्रज्ञान आत्मसात करून जमिनीतील पाण्याच्या प्रवाहाचा अचूक शोध घेतला आहे. त्यांच्या या कौशल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बोरवेलचे अंदाज चुकल्याने होणारे आर्थिक नुकसान टळले आहे. अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक ठिकाणी अचूक निदान केले आहे. डॉ. सोरटे आणि त्यांचे मार्गदर्शक प्रा. डॉ. अविनाश खरात व डॉ. नंदकुमार धर्माधिकारी यांनी ‘नाव मीटर’ नावाचे उपकरण विकसित केले आहे, जे पाण्याच्या प्रवाहाचा अचूक वेध घेते.
यासोबतच, डॉ. सोरटे यांनी जिओपॅथिक स्ट्रेस झोनमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी ‘नावराज अटेन्युएशन सिस्टीम’ हे नवीन तंत्रज्ञान शोधले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघात कमी करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकते. त्यांच्या या कार्याची दखल घेत अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कने त्यांना चर्चासत्रासाठी आमंत्रित केले होते. तसेच, कोईम्बतूर येथील यूइर रोड सेफ्टी हॅकेथॉनमध्ये त्यांच्या संशोधनाचा विशेष सन्मान करण्यात आला.

पावसाळ्यात ड्रेनेजमध्ये पडून होणारे अपघात टाळण्यासाठी डॉ. सोरटे यांनी ‘इंडियन सॉल्ट शेकर मॅन होल कव्हर’ हा नवीन पर्याय शोधला आहे. त्यांच्या या शोधात सोहम बोराटे आणि विनायक गुंड या विद्यार्थ्यांचेही योगदान आहे.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्चचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख असलेले डॉ. सोरटे यांनी सांगितले की, चांगल्या मार्गदर्शनामुळे त्यांना हे समाजोपयोगी संशोधन करणे शक्य झाले आणि भारत सरकारने त्यांच्या तीन शोधांना पेटंटही दिले आहे.
डॉ. सोरटे आता या संशोधनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांशी संपर्क साधत आहेत, जेणेकरून त्यांचा उपयोग समाजाला मोठ्या प्रमाणात होऊ शकेल.
