पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणामुळे भिगवण भागातील शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या गंभीर समस्येबद्दल सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.
आज, १६ मे २०२५ रोजी भिगवण येथे आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आणि पुणे व पिंपरी चिंचवडमधील पर्यावरण कार्यकर्त्यांनी उजनी परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिली. या भेटीदरम्यान तलावाची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर भिगवण येथील दुर्गा मंदिरात शेतकऱ्यांची जनजागृती बैठक झाली.
या बैठकीत बोलताना मारुती भापकर यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नद्या प्रदूषित होण्यास शहरवासी जबाबदार असल्याचे स्पष्टपणे कबूल केले. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागताना म्हटले की, “पवना, इंद्रायणी, मुळा आणि मुठा या नद्या प्रदूषित करण्याचे पाप आमचेच आहे. आम्ही आपले गुन्हेगार आहोत आणि आमच्याकडून झालेल्या चुकांबद्दल आम्ही आपल्या चरणी नतमस्तक होऊन जाहीर माफी मागत आहोत.”

भापकर यांनी पुढे आश्वासन दिले की, यापुढे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे शहरवासीयांकडून नद्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. यासाठी महापालिका, पर्यावरण विभाग, एमआयडीसी, पीएमआरडीए आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे एकत्रितपणे लढा देण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मिसळणारे मैलायुक्त पाणी, एमआयडीसीचे रासायनिक पाणी आणि प्लास्टिक कचरा यामुळे भीमा नदी प्रदूषित होते. याच दूषित पाण्यामुळे उजनी धरण आणि भीमा-चंद्रभागा नद्यांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच, यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र सिंह यांनी मार्गदर्शन केले आणि पुढील दिशा स्पष्ट केली. भिगवणच्या ग्रामस्थांनी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. मारुती भापकर यांनी त्यांचे आभार मानले.

