50
छत्रपती संभाजीनगर (मॅक्स मंथन डेली न्यूज): ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन राज्यातील ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर निवेदन दिले आणि सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान, दीपक केदार यांनी रामदास आठवले यांच्यासमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या:
- गायरान जमिनीचे नियमन: 2010 पर्यंत ताब्यात असलेल्या गायरान जमिनी रेगुलर करून सातबारा द्यावा आणि भूमिहीनांना जमीन वाटप करावे.
- सौर ऊर्जा प्रकल्पांना आळा: मागासवर्गीय, दलित, आदिवासींच्या ताब्यातील गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी हिसकावल्या जात आहेत. ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी.
- सामाजिक न्याय विभागाचे स्वतंत्र बजेट: सामाजिक न्याय विभागाचा 8,000 कोटी आणि 410 कोटी रुपये लाडली बहिण योजनेसाठी वळवले जात आहेत. यावर रोख लावण्यासाठी स्वतंत्र बजेट कायदा करावा.
- महाबोधी बुद्धविहारावरील हल्ल्याची दखल: महाबोधी बुद्धविहार येथे भंतेजी व महिलांवर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने तात्काळ दखल घ्यावी.
- दलित अत्याचार थांबवा: राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. बारामती येथील दहावीत शिकणाऱ्या दलित मुलीची छेड काढल्याने तिने आत्महत्या केली. बीड येथील साक्षी कांबळे प्रकरण गंभीर आहे. दलित अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
- सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी कारवाई: सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून सरकारने गुन्हा दाखल करावा.
- झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन: नव्याने निर्माण झालेल्या झोपडपट्ट्या कायम करून त्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात.
- आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना: बंद केलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन निधी योजना पुन्हा सुरू करावी.
- महात्मा फुले महामंडळाच्या फायली: महामंडळाच्या प्रलंबित फायली तात्काळ निकाली काढाव्यात.

यावेळी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते बाबुराव कदम, महाराष्ट्र प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे आणि जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगावणे उपस्थित होते.
दीपक केदार यांनी स्पष्ट केले की, सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा सुरूच राहील.
