५३० कोटींचा राष्ट्रीय महामार्ग ५ वर्षांतच खड्डेमय!
नांदगावपेठ-पांढुर्णा रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय मंत्र्यांकडे केली तक्रार
२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
मोर्शी, प्रतिनिधी अविनाश वानखेडे – अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ ते पांढुर्णा या ९६ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल ५३० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा सिमेंटचा रस्ता अवघ्या ४-५ वर्षांतच अनेक ठिकाणी खड्डेमय झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे.

अपूर्ण पूल आणि वाढते अपघात
या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी सिमेंट पॅनलला भेगा पडल्या आहेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरील मोर्शी येथील नळा नदीवरील पूल आणि दापोरी येथील नदीवरील पुलाचे काम अजूनही अपूर्ण आहे. या अपूर्ण पुलांमुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी झाली आहे, असेही वाळके यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे हे धोकादायक पूल तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत?
या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत रुपेश वाळके यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. याविषयी अनेक तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारांच्या दावणीला बांधला गेला असल्याचा आरोप नागरिकांमध्ये होत आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे आणि दबलेल्या भागांमुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही, ज्यामुळे अपघात वाढले आहेत. यावर जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने आवाज न उठवल्याबद्दलही वाळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित विभाग व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
