अजितदादांचा अपघात की नियोजित घात? रोहित पवारांचा खळबळजनक संशय; विमान अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
पिंपरी/पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, ११ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर आज पत्रकार परिषद घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “हा केवळ अपघात नसून तो नियोजित घात असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित पवार म्हणाले की, या प्रकरणाचा तपास केवळ सीआयडीमार्फत (CID) करून चालणार नाही. विमान अपघातांच्या चौकशीत तज्ज्ञ असलेल्या विशेष संस्थेकडून याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अपघाताच्या संदर्भात त्यांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
-
वेळापत्रकात बदल: अजितदादांच्या दौऱ्याचे वेळापत्रक अचानक का बदलण्यात आले? तसेच विमानाची वेळ आणि पायलट शेवटच्या क्षणी बदलण्यात आला होता का?
-
डेटा विसंगती: केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आणि एटीसी (ATC) ट्रान्स्क्रिप्टमधील वेळेत मोठी तफावत आहे.
-
फ्लाइट रडार: अपघाताच्या बरोबर एक मिनिट आधीच फ्लाइट रडारचा डेटा बंद का झाला? हा योगायोग की कट?
-
लँडिंगचा निर्णय: दृश्यमानता (Visibility) कमी असतानाही विमान उतरवण्याचा निर्णय का झाला आणि ‘रनवे क्रमांक ११’ वरच उतरण्याचा आग्रह कोणी धरला?
अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये पायलटकडून कोणताही संवाद न होणे, ही बाब अत्यंत संशयास्पद असल्याचे रोहित पवारांनी नमूद केले. विमान जमिनीपासून आधीच कमी उंचीवर आणले गेले होते का? या सर्व तांत्रिक बाबींचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत रोहित पवारांनी सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.
या पत्रकार परिषदेनंतर आता राज्य आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अजितदादांच्या अपघाताचे गूढ उकलण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
