मुर्तिजापूरच्या ग्रामीण विकासाला ‘पाणंद रस्त्या’चा आधार! आमदार हरिषभाऊ पिंपळे ॲक्शन मोडवर; रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना कडक निर्देश
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या ‘पाणंद रस्त्यांच्या’ कामांना आता मोठी गती मिळणार आहे. मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. “शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्ते सक्षम असणे ही काळाची गरज आहे,” असे स्पष्ट करत आमदारांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
बैठकीमध्ये आमदार पिंपळे यांनी मंजूर रस्त्यांमधील तांत्रिक अडथळे आणि प्रलंबित देयकांबाबत सविस्तर चर्चा केली. रस्ते अडवण्याचे प्रकार किंवा तांत्रिक चुकांमुळे रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच, ज्या भागात अद्याप रस्ते नाहीत, अशा दुर्गम भागांसाठी नवीन पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
आमदार हरिषभाऊ पिंपळे यांनी यावेळी प्रशासनाला सुनावले की, “पाणंद रस्ते ही केवळ सरकारी योजना नसून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारी पायपीट थांबवण्यासाठी हे रस्ते गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे.” त्यांच्या या आक्रमक पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले रस्ते आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रवींद्र कापसीकर, गटविकास अधिकारी (मुर्तिजापूर) मिलिंद मोरे, प्रभारी बीडीओ (अकोला) पी.पी. पटोकर, सहाय्यक बीडीओ एस.के. इंगळे, निवासी तहसीलदार रवींद्र राऊत आणि समिती सदस्य मनोज पारसकर, भूषण कोकाटे, आनंद बांगड उपस्थित होते.
आमदार पिंपळे यांच्या या पुढाकारामुळे मतदारसंघातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार असून, शेती आणि बाजारपेठ यांमधील दळणवळण सुलभ होणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


