पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून मुर्तिजापुरात रक्ताचा सडा! तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुर्तिजापूर : शहरातील मोचीपुरा परिसरात नळावर पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, मुर्तिजापूर शहर पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्यादी लक्ष्मी लखन पचारे (४०) यांची पुतणी नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. तिथे तिचा आरोपी क्रमांक ४ च्या पत्नीसोबत वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादीचे दीर गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. काही वेळातच हा वाद अधिक विकोपाला गेला आणि आरोपींनी फिर्यादीच्या नातेवाईकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण सुरू असताना लक्ष्मी पचारे या मध्यस्थी करण्यासाठी धावल्या. यावेळी आरोपी करण अनभोरे याने लोखंडी पाईप आणून हल्ला चढवला. लक्ष्मी यांचा मुलगा अविनाश पचारे हा आपल्या आईच्या बचावासाठी मध्ये आला असता, आरोपीने त्याच्या डाव्या हातावर पाईपने जोराने प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात अविनाश रक्तबंबाळ होऊन जखमी झाला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोचीपुरा येथील खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
१) सागर पचारे (६० वर्ष)
२) शिवा शिवरकर (२५ वर्ष)
३) आशिष अनभोरे (२२ वर्ष)
४) करण अनभोरे (२२ वर्ष)
मुर्तिजापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा (अ.नं. २६५/२०२६) दाखल केला आहे. ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रभाकर नागे आणि योगेश लोणकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. किरकोळ वादातून शहरात निर्माण झालेल्या या तणावामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
