news
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत सामाजिक परिवर्तनाचे मंथन! महापुरुषांच्या विचारांवर डॉ. सबनीस आणि गिरीश प्रभुणे यांची वैचारिक जुगलबंदी

पिंपरीत सामाजिक परिवर्तनाचे मंथन! महापुरुषांच्या विचारांवर डॉ. सबनीस आणि गिरीश प्रभुणे यांची वैचारिक जुगलबंदी

साहित्य अकादमी विजेते राजू बाविस्कर यांचा सत्कार; पारधी ग्रंथ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पोलीस प्रशिक्षणात संवेदनशीलतेचे धडे दिले पाहिजेत; ‘सामाजिक परिवर्तनाचे चिंतनपर्व’ सोहळ्यात हेमंतराव हरहरे यांचे प्रतिपादन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २६ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “खरे सामाजिक परिवर्तन घडवायचे असेल तर तरुणांनी समाजात उतरून बंधुता, समरसता आणि राष्ट्रकार्याची जाणीव जोपासली पाहिजे. भटक्या-विमुक्तांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘पारधी’ सारख्या ग्रंथांचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. तसेच पोलीस प्रशिक्षणात संवेदनशीलतेचे धडे देऊन समाज व पोलीस यांच्यातील संवाद वाढवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष हेमंतराव हरहरे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय आणि मातंग साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षानिमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सामाजिक परिवर्तनाचे चिंतनपर्व’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्यात वैचारिक जुगलबंदी पाहायला मिळाली. डॉ. सबनीस यांनी महापुरुषांच्या सामर्थ्य आणि मर्यादांवर भाष्य करत सत्याची बाजू ठामपणे मांडण्याचे जाहीर केले. यावर प्रतिवाद करताना गिरीश प्रभुणे यांनी स्पष्ट केले की, गोळवलकर गुरुजींनी कधीही चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला नाही.

गिरीश प्रभुणे आपल्या भाषणात म्हणाले की, “भटक्या-विमुक्त समाजावर शतकानुशतके अन्याय, उपेक्षा आणि अमानुष छळ झाला, तरीही हा समाज आपल्या हिंदू सांस्कृतिक मुळांशी निष्ठेने जोडलेला आहे. हे दुःख केवळ करुणेचा विषय नसून समाजव्यवस्थेच्या अंतःकरणाला प्रश्न विचारणारे अस्वस्थ सत्य आहे.”

  • डॉ. श्रीपाल सबनीस: “सत्य कोणत्याही चौकटीत मावत नाही. विषमता आणि शोषणातून समाजाची मुक्ती करण्यातच विद्वानांचा खरा पुरुषार्थ आहे.”

  • निलेश गद्रे: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकार्यात अनेक साम्यरेषा आहेत. दोघांचेही ध्येय राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक परिवर्तन हेच होते.”

  • प्रा. डॉ. केशवराव देशमुख: “पारधी हा ग्रंथ केवळ वाङ्मयीन कलाकृती नसून तो ‘वेदनांचे आभाळ’ आणि परिवर्तनाची दिशा देणारा सामाजिक दस्तऐवज आहे.”

  • धनंजय झोंबाडे: “डॉ. सबनीस यांचा ‘संवादी युगपुरुष’ हा ग्रंथ अण्णाभाऊ साठे आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय घडवणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.”

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजू बाविस्कर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या चित्रमय शैलीत सत्काराला उत्तर दिले.

या सोहळ्यास माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. धनंजय भिसे, प्रा. संग्राम गोसावी, निलेश गद्रे, धनंजय झोंबाडे यांच्यासह अनेक विचारवंत, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिया प्रभूडॉ. रुपाली पोखरकर यांनी केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!