शेतकऱ्यांच्या कष्टाला श्रींचा आशीर्वाद लाभो! अरुण पवार व बालाजी पवार यांच्यातर्फे जगद्गुरू तुकोबाचरणी सेंद्रिय केशर आंब्याची भव्य रास
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २१ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “आंबा हा फळांचा राजा मानला जातो. आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत तो समृद्धी, गोडवा व उत्तमतेचे प्रतीक आहे. निसर्गाकडून आणि शेतीतून आलेले पहिले अन्न किंवा फळ देवाच्या चरणी अर्पण करण्याची आपली प्राचीन संस्कृती आहे. ही केवळ धार्मिक सेवा नसून, बळिराजाच्या अखंड कष्टाला ईश्वरी अधिष्ठान देण्याचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या घामातून पिकलेल्या या पिकाला संत कृपेचा आशीर्वाद लाभो, हीच विठ्ठल-चरणी प्रार्थना आहे,” अशा भावना श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र आणि समाजभूषण पुरस्कार विजेते अरुण पवार यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शासनाचा मानाचा वनश्री वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त अरुण पवार आणि धारूरचे लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार यांच्या वतीने ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेच्या मुहूर्तावर देहू येथील जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे मुख्य साधना स्थळ असलेल्या पवित्र ‘भंडारा डोंगर’ येथे एका विशेष धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बंधूंच्या स्वतःच्या शेतातील संपूर्ण सेंद्रिय (Organic) पद्धतीने पिकवलेल्या दर्जेदार केशर आंब्याची भव्य रास जगद्गुरू तुकोबांच्या चरणी अर्पण करण्यात आली.
भंडारा डोंगरावरील मुख्य मंदिरासोबतच, पवार बंधूंनी आपल्या परिसरातील आणि राज्यातील इतर प्रमुख श्रद्धास्थानांवरही ही आंब्याची रास भरून दर्शन घेतले. यामध्ये प्रामुख्याने पिंपळे गुरव येथील ऐतिहासिक हनुमान मंदिर आणि भैरवनाथ मंदिर, धारूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिर, महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर, पिंपळे गुरव येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर.
या सर्व देव-देवतांच्या गाभाऱ्यात आकर्षक पद्धतीने केशर आंब्यांची रास (आंबरस नैवेद्य) रचण्यात आली होती. पिवळसर केशर आंब्यांच्या या सुवासिक आणि मनमोहक आरासमुळे मंदिराचे वातावरण अत्यंत प्रसन्न झाले होते. यावेळी दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना हा आंबा महाप्रसाद म्हणून वितरीत करण्यात आला.
अरुण पवार आणि सरपंच बालाजी पवार यांनी राबवलेल्या या उपक्रमातून समाजाला, विशेषतः आजच्या शेतकरी बांधवांना एक मोठा बोध मिळतो. आजच्या रासायनिक युगात जमिनीचा कस आणि मानवी आरोग्य धोक्यात आले असताना, पवार यांनी पूर्णपणे ‘सेंद्रिय’ (Organic) शेतीचा अवलंब करून हा केशर आंबा पिकवला आहे. शेतीत कष्ट करून उत्तम दर्जाचे उत्पादन घेणे आणि मिळालेल्या उत्पन्नातील पहिला वाटा ईश्वराला व समाजाला अर्पण करणे, हा वारकरी संप्रदायाचा मुख्य विचार त्यांनी या कृतीतून जिवंत ठेवला आहे. ‘निसर्ग हाच देव’ मानून केलेल्या या अनोख्या आंबरस पूजेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


