आषाढी वारी पालखी सोहळा मार्ग अन् विसावा ठिकाणांची महापालिका आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा त्रुटी राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी काटेकोर दक्षता घ्यावी. पालखी मुक्काम, विसावा स्थळे आणि संपूर्ण पालखी मार्गावर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधांचे प्रभावी नियोजन करावे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाशी चोवीस तास योग्य समन्वय ठेवून काम करावे,” असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शहरातील संपूर्ण पालखी मार्ग, मुक्काम स्थळे आणि विसावा ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात निगडी येथील ‘भक्ती-शक्ती’ चौकात भव्य स्वागत केले जाते. यानंतर हा सोहळा आकुर्डी येथे पहिल्या मुक्कामासाठी मार्गस्थ होतो. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी या स्वागत स्थळाची, मुख्य मार्गाची आणि आकुर्डीतील मुक्काम स्थळाची सखोल पाहणी केली. तर दुसरीकडे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत दिघी येथील ‘मॅगझीन’ चौकात केले जाते. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी या पालखी सोहळ्याच्या विसाव्याच्या ठिकाणासह महापालिका कार्यक्षेत्रातील संपूर्ण मार्गाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते.
भक्ती-शक्ती चौक येथे उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या मुख्य स्वागत कक्षाची पाहणी करताना मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहरी अभियंता बापूसाहेब गायकवाड, मनोज सेठिया, उप आयुक्त प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आरोग्य अधिकारी सीताराम गायकवाड तसेच पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश नांदुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीता गायकवाड आणि महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर आयुक्तांनी दिंड्यांचे हक्काचे मुक्काम स्थळ असलेल्या आकुर्डी येथील ‘मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालयाची’ पाहणी केली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर आणि कार्यकारी अभियंता वैशाली ननवरे उपस्थित होते. आकुर्डीनंतर आयुक्तांनी खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रस्ता आणि दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणांना भेटी दिल्या. या प्रसंगी क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे, कार्यकारी अभियंता उमेश मोने आणि पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी माहिती दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी स्वागतासाठी मोशी येथील मॅगझीन चौकात उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाहणी करताना क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तांनी मोशीतील थोरल्या पादुका मंदिर या विसावा ठिकाणाचीही पाहणी केली.
पालखी सोहळा पावसाळ्याच्या सुरुवातीला होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवावी. शहरातील सर्व होर्डिंग्जची तातडीने ऑडिट करून धोकादायक व बेकायदेशीर होर्डिंग्जवर तात्काळ निष्कासनाचा बडगा उचलावा. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही साचणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पाणी निचरा व्यवस्था चोवीस तास खुली ठेवावी. रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवून मार्ग सुरक्षित करावा. मेट्रो किंवा इतर स्थापत्य कामे सुरू असलेल्या ठिकाणी कडक बॅरिकेडिंग करावे. ज्या ठिकाणी दिड्यांचा वर्षानुवर्षे मुक्काम असतो, तेथे कायमस्वरूपी शुद्ध पिण्याच्या पाण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी. पालखी मार्ग, मुक्काम स्थळे आणि पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणावर फिरती शौचालये (Mobile Toilets) उपलब्ध करून द्यावीत. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी २४ तास रुग्णवाहिका, फिरते दवाखाने सज्ज ठेवावेत. प्रत्येक मुक्काम व विसावा स्थळावर औषध फवारणी, धुरीकरण आणि कचरा उचलण्याची प्रक्रिया तीनही शिफ्टमध्ये सुरू ठेवावी. मार्गातील राडारोडा व अडथळे तात्काळ हटवावेत. वारकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी मोठे दिशादर्शक व पार्किंग माहितीचे फलक लावावेत. महत्त्वाच्या चौकात स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करावी. प्रत्येक मुक्काम स्थळी महापालिकेचा सुसज्ज नियंत्रण कक्ष (Control Room) असावा. संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे सुस्थितीत आणि सुरू असल्याची खातरजमा सुरक्षा विभागाने करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले.
लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सर्व विभाग आता युद्धपातळीवर कामाला लागले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


