अहिल्याबाई होळकर: साहस, पराक्रम आणि वीरतेचं मूर्तिमंत उदाहरण! – काशिनाथ नखाते (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)
अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांकडून आदरांजली!
पिंपरी, दि. ३१ मे २०२५: राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताची सूत्रे हाती घेतल्यावर आपल्या प्रभावी रणनीतीने अनेक युद्धे जिंकली आणि सैन्याचे समर्थ नेतृत्व केले. त्यांनी राज्यातील अशांतता दूर करून जनतेला आधार दिला. राज्याचा विकास व्यवस्थित व्हावा यासाठी राज्याची विभागणी केली. अहिल्याबाई नेहमी महिलांच्या हक्कांसाठी लढल्या. विधवा स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी कायद्यात बदल केले आणि विधवांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला. अहिल्याबाई होळकर या खऱ्या अर्थाने साहस, पराक्रम आणि वीरतेचं प्रतीक होत्या, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, बांधकाम कामगार समिती आणि महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीतर्फे आज सामाजिक कार्यकर्ते यशवंत होळकर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, धाराशिव जिल्हा अध्यक्ष दादा खताळ, मनपा सदस्य सलीम डांगे, समाधान कदम, निरंजन लोखंडे, विजय लहाने, अनिता कदम, वंदना सावंत, अंजना भुसे, सुनंदा जाधव, लक्ष्मी कोरे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
यशवंत होळकर म्हणाले की, अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांना कुंभेरच्या युद्धात वीरमरण आले आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव मालेराव यांचेही दुःखद निधन झाले. असे दोन मोठे आघात सहन करूनही अहिल्याबाईंनी मोठ्या धैर्याने राज्याचा कारभार चालवला. अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक स्थळे आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे बांधकाम पूर्ण केले. त्यांनी उत्तम कौशल्य आणि बुद्धिमत्तेने किल्ले, विश्रामगृहे, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आणि अनेक रस्ते बांधले, जे आजही आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.