पिंपरी चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूबाबत अनुरूप जोडी विवाह संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा रोहिणीताई रासकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ही आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे,” असा ठाम आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणातील आरोपी पती, सासू, नणंद, सासरे आणि दीर यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
रोहिणीताई रासकर म्हणाल्या, “हुंडा नको म्हणणारे, पण ‘इज्जतीप्रमाणे’ काही तरी द्या म्हणणाऱ्यांपासून सावध राहा. हीच मंडळी नंतर मुलींचा छळ करतात. मुलगी ही केवळ संसारासाठी दुसऱ्या घरात जाणारी वस्तू नाही. तिचेही स्वप्नं, भावना असतात. तिचा आदर करा.”
लग्नाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “लग्न म्हणजे केवळ वय नव्हे, ती एक जबाबदारी आहे. फक्त वय झालं म्हणून मुलीचं लग्न करू नका. ती आपल्या घरातून दुसऱ्या घरात जाते, तिथे तिचं भावनिक व मानसिक आयुष्य कसं असेल याचा विचार करा. पालकांनी इज्जतीपेक्षा आपल्या मुलीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं.”
सोशल मीडियावर वैष्णवीचा नवरा आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार हुंड्याची मागणी व छळ झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर रोहिणीताई म्हणाल्या, “ही केवळ एक वैष्णवीची कहाणी नाही, अशा अनेक मुली समाजात दररोज बळी पडत आहेत. हे थांबवायचं असेल, तर आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर पोलीस कारवाई करत नसतील, तर आम्ही महिलांनीच ती जबाबदारी स्वीकारू.”
यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले: “मुलीने एकतर्फी प्रेम करू नयेत का? पालक केवळ ‘इज्जतीसाठी’ गप्प का बसतात? महिला स्वतः कधी सक्षम होणार? समाज अजूनही हुंडा घेणाऱ्यांना समर्थन का देतो?”
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. मात्र, रोहिणीताईंनी मागणी केली आहे की, हुंड्यासाठी होणारे अत्याचार थांबवण्यासाठी दोषींना उघडपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून समाजात एक कठोर संदेश जाईल आणि भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध घालता येईल.