पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. यानंतर पाकिस्तानने पुंछमध्ये अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात १२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले. या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “जर पाकिस्तानने परिस्थिती चिघळवली, तर भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर द्यावे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर दिलेले प्रत्युत्तर हे केवळ दहशतवादी तळांवर केंद्रित होते आणि तणाव वाढवण्याच्या हेतूने नव्हते. भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे. “आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्या नष्ट करत होतो. परंतु पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर, विशेषतः पुंछमध्ये विनाकारण गोळीबार केला आहे. यात अनेक निरपराध नागरिकांचा जीव गेला आहे,” असे आंबेडकर म्हणाले.
पाकिस्तानने विनाकारण केलेल्या या गोळीबारात आणि तोफगोळ्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना ‘शहीद’ म्हणून घोषित करावे आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. “पाकिस्तान सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत आहे आणि त्यांनी भारतीय वायू सेनेचे राफेल जेट पाडले आहे, असा खोटा दावा करत आहे. याविरोधात भारताने भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवण्यासाठी पाकिस्तानचे हे खोटे दावे जोरदारपणे उघड करावेत. भारताने पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी आपले सर्व राजनैतिक प्रयत्न वापरावेत. आणि जर पाकिस्तानने परिस्थिती आणखी चिघळवली, तर भारताने कडक प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहू नये,” असे आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या आगळीकीला भारताने कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यावे, यावर देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
