यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि IBM मध्ये सामंजस्य करार
पुणे(मॅक्स मंथन डेली न्यूज): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील कंपनी IBM यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच रोजगाराभिमुख संगणकीय कौशल्य आधारित शिक्षण मिळणार आहे.
या करारानुसार, मुक्त विद्यापीठाच्या पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉक चेन आणि डेटा ॲनॅलिटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना IBM कंपनीचे प्रमाणपत्र दिले जाईल.
या सामंजस्य कराराच्या वेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, IBM कंपनीच्या भारतातील IBM इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनचे सल्लागार व प्रमुख संजीव मेहता, पुण्यातील यशस्वी स्किल्स लिमिटेडचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुक्त विद्यापीठाच्या पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असेल. पहिल्या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉक चेन यांसारख्या दहा उदयोन्मुख तंत्रज्ञानांचे (Emerging Technologies) मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल. दुसऱ्या वर्षी या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, यावर भर दिला जाईल. तसेच, विविध विद्याशाखांमध्ये AI चा वापर कसा करावा यासाठी AI in Arts, AI in Commerce किंवा AI in Management असे अभ्यासक्रम असतील. तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रोजेक्टद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. प्रति वर्ष 60 तासांचे प्रशिक्षण असेल आणि त्यासाठी 4 श्रेयांक (क्रेडिट) देण्यात येतील.
याव्यतिरिक्त, मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी देखील IBM ने 60 तासांचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे.
या कराराबद्दल बोलताना, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, “IBM सोबतच्या या प्रशिक्षणामुळे मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी अधिक उत्तम प्रकारे रोजगारक्षम बनतील. सध्या सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने प्रवेश करणाऱ्या या नवीन तंत्रज्ञानामुळे बदलत्या कार्यप्रणालीशी जुळवून घेणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल. विद्यापीठ स्तरावर अशा प्रकारच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे. या करारामुळे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे मुक्त विद्यापीठाचे ब्रीद वाक्य अधिक जोरकसपणे अधोरेखित होईल. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध व्हावे आणि स्पर्धेच्या युगात मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थीसुद्धा अग्रेसर असावा, या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.”
प्रा. सोनावणे पुढे म्हणाले, “विद्यापीठातून बीए आणि बीकॉमसह पारंपरिक शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे रोजगाराभिमुख शिक्षण आणि शिक्षणानंतर चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.”
IBM इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनचे सल्लागार व प्रमुख संजीव मेहता म्हणाले, “यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केल्यामुळे IBM कंपनीस तळागाळातील, आर्थिक दुर्बल घटकातील मोठ्या जनसमुदायाशी जोडले जाण्याची संधी मिळाली आहे.”
